‘‘झाडावरती घडे लटकले
घड्यात होते पाणी
त्या पाण्याच्या वड्या थापुनी
कुरकुर खाते कोणी
आता सांगा खिरापत... !
माझी सांगा खिरापत.... !’’
‘‘खोबरं !’’
बरोबर !
‘‘अफगणातील इजार भारी
त्याच्या हाती मोती
त्या मोत्यांना उन्हात पिकवून
पोरे बाळे
खाती
आता सांगा खिरापत
माझी सांगा खिरापत’’
‘‘मनुका..... !’’
‘‘कोकणातला पिवळा बाळू
फार लागला माजू
पकडून आणा भट्टीवरती
काळीज त्याचे भाजू’’
‘‘काजू.... !’’
‘‘तालमीतला पोर मारतो
पीठावरती थापा
सुरकुतलेली बोटे त्यांचा
गोड लागतो पापा
आता सांगा खिरापत
माझी सांगा खिरापत’’
‘‘खारका..... !’’
‘‘आधी होती काळी पिवळी
नंतर झालीस गोरी ग
देवळातुनी का ग फिरती
वेणुगावच्या पोरी ग
आता सांगा खिरापत
माझी सांगा खिरापत’’
‘‘हरलो....’’
‘‘खडीसाखर !’’
‘‘चट्टा मट्टा
बाळं भट्टा
आता मागील त्याला रट्टा
पंजा चाटीत निजेल गुपचुप
तो वाघाचा पठ्ठा’’
आता झाली खिरापत..... !
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.