गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.
साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची
स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची
ज्ञात काय नव्हतें मजसी हिचें शुद्ध शील ?
लोककोप उपजवितो का परि लोकपाल ?
लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची
अयोध्येत जर मी नेतों अशी जानकीतें
विषयलुब्ध मजसी म्हणते लोक, लोकनेते
गमावून बसतो माझ्या प्रीत मी प्रजेची
प्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा
हेंच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं
प्राणही प्रसंगी देणे प्रजासुखासाठी
हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटीं
मिठी सोडवूं मी धजलों म्हणुन मैथिलीची
वियोगिनी सीता रडतां धीर आवरेना
कसे ओलवूं मी डोळे ? उभी सर्व सेना
पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची
राम एक हृदयीं आहे सखी जानकीच्या
जानकीविना ना नारी मनीं राघवाच्या
शपथ पुन्हां घेतों देवा, तुझ्या पाउलांची
विषयलोभ होता जरि त्या वीर रावणातें
अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागरातें
स्पर्शिलीं तयें ना गात्रें हिच्या साउलीचीं
अग्निदेव, आज्ञा अपुली सर्वथैव मान्य
गृहस्वामिनीच्या दिव्यें राम आज धन्य
लोकमाय लाधे फिरुनी प्रजा अयोध्येची
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.