आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
उदास कां तूं ? आवर वेडे, नयनांतिल पाणी
लाडके, कौसल्ये राणी
वसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी
ती वाणी मज म्हणे, "दशरथा, अश्वमेध तूं करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी."
विचार माझा मला जागवी, आलें हें ध्यानीं
निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली -
"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थली.
इष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी"
आले गुरुजन, मनांतलें मी सारें त्यां कथिले
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें
नवनीतासम तोंच बोलले स्निग्धमधुर कोणी
"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे", मनोदेवता वदे,
"याच मुहूर्ती सोड अश्व तूं, सत्वर तो जाउं दे"
"मान्य" - म्हणालों - "गुर्वाज्ञा" मी, कर जुळले दोन्ही
अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतों स्वतः
त्याच्या करवी करणे आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनीं
सरयूतीरीं यज्ञ करूं गे, मुक्त करांनी दान करूं
शेवटचा हा यत्न करूं गे, अंती अवभृत स्नान करूं
ईप्सित तें तो देइल अग्नी, अनंत हातांनीं
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..